Friday 24 February 2017

कोमेजली ती फुले

कोमेजली ती फुले.............



Image result for images of flowers









  






 होती ती ही नाजूक  मनोहारी             
 उगवत्या दिनासवे मोहक हसणारी
स्वप्न-नगरीत अपुल्याच रमणारी
नित्य नव्या नादात गुणगुणणारी
          
            समजावले सार्‍्यांनी, दिली चेतावणी
            स्वप्न नसते सदासाठी, हो जरा जागी
            जीवन नसते पायघडी मखमाली
            येईल तूफान, होईल ताप भयकारी

हसली ती फुले मनमुराद
होती दवबिंदूंची रम्य ती साथ
झुळूक सवे वार्‍्याची ती मंजूळ
तीच ती भोळी स्वप्ने नयनात

            ना लागली चाहूल, ना जाणे आले कुठूनी
            कधी आला झंजावात, कधी वारा वादळी
            कधी बरसला अतिताप, ग्रीष्म असह्य अविरत
  तर कधी वर्षाव पर्जन्याचा, होई महापूर

उध्वस्त करून गेले ते ती मानस-नगरी
गेले विरूनी, राहिली केवळ स्वप्न-स्मृती
गोंधळली, बाबरली पाहूनी हे रूप जीवनाचे
कोमेजली ती फुले जाणूनी कटूसत्य नियतीचे                          




Image result for images of withered flowers



















आधुनिक युगाचे वायरमन

आधुनिक युगाचे वायरमन

जसजसे दिवस पालटतात, तश्या किती तरी गोष्टी बदलत जातात, नाही का? आता प्रवासाचीच गोष्ट घ्या ना.

पूर्वौ प्रवासाला निघायचे म्हणजे सर्वप्रथम होल्डॉल बाहेर काढून, साफसूफ करून बांधायच्या तयारीला लागायचे. आताच्या मुलांना तर प्रश्न पडेल, (' दारू म्हणजे रे काय, भाऊ' च्या चालीवर) 'होल्डॉल म्हणजे रे काय, ब्रो?' त्यांना तो बहुधा पुराण वस्तूसंग्रहालयात (आता ही आणखी कुठली वा कोणत्या ग्रहावरची जागा?) जाऊन पाहायला लागेल. त्या एका बोजड दिसणार्‍्या वस्तूच्या पोटात काय काय मावत असे -– झोपण्यासाठी अंथरायच्या–पांघरायच्या चादरींपासून ते बारीक सारीक कपडे, टॉवेल्स किंवा अगदी फणी-कंगवेसुध्दा.


साबणाची डबी, टॉवेल, टूथब्रश-पेस्ट अश्या गोष्टी आठवणीने सुटकेसमध्ये ठेवाव्या लागत. …..आता त्यांची गरजच नसते. बहुतेक सर्वच हॉटेल्समधून तुम्हाला या गोष्टी आधीच पुरवल्या जातात – अगदी केसांचा शँम्पू, बॉडी लोशन्ससुध्दा. म्हणजे प्रवासाची बांधाबांध सोपी झाली, नाही का?

पण तसंच काही नाही, हं. ज्याप्रमाणे बर्‍्याचश्या गोष्टी सोबत नेण्याची गरज उरली नाही, त्याचप्रमाणे दुसर्‍्या बर्‍्याचश्या गोष्टी आठवणीने नेण्याची आवश्यकताही निर्माण झाली आहे.


आता स्मार्टफोन तर सततच हाताला (किंवा कानाला) चिकटलेलाच असतो, तेव्हा तो सोबत न्यायलाच हवा. आजकाल बर्‍्याच जणांचा प्रवास हा ऑफिसच्या कामानिमित्ताने असतो. आणि अगदी जरी 'केवळ पर्यटना'साठी घराबाहेर पडले, तरीही ऑफिसचे काही ना काही काम शेपटीसारखे पाठीमागून आपल्याला चिकटून येतच असते. म्हणजे त्यासाठी लॅपटॉप सोबत नेणे आलेच. (कारण, फोन कितीही 'स्मार्ट' असले तरी सारी ऑफिसची कामे त्यावर होणे शक्य नसते).

मग हे स्मार्ट फोन्स, लॅपटॉप्स हवे, तर त्यांच्या चार्जर वायर्सही सोबत हव्याच. फोन्ससाठी बहुधा कोणत्याही अन्य स्मार्टफोनचा चार्जर चालू शकतो. पण आपण हा चान्स घेऊ शकत नाही ना; समजा वेळेवर कुणाचा नाही मिळाला चार्जर किंवा हॉटेलने पुरविलेला नाही फिट् झाला, मग? आली का पंचाईत? त्यापेक्षा आपलाच फोन चार्जर न्यावा हे बरे. त्याशिवाय, फोनवर 'म्यूझिक' ऐकणे हे तर अत्यावश्यक. मग त्यासाठी इयरफोन्स नकोत का? अजून एक वायर.

लॅपटॉपसाठी मात्र चार्जर जरूरच आहे; मला वाटतं प्रत्येक कंपनीचे चार्जर्स वेगवेगळे असतात. म्हणजे ते एक अजून अवजड वायरचे भेंडोळे. त्यात पुन्हा, गणपतीबाप्पांचे जसे त्यांच्या उंदराविना चालत नाही, तसेच जर तुम्हालाही लॅपटॉपसाठी उंदीरमामाची (माऊस) गरज पडत असेल तर तो मूषक आणि त्याचबरोबर त्याची लांब शेपूट! आता वायरलेस उंदीरही मिळतात म्हणा, पण निदान ते एक उपकरण तरी वाढलेच ना!

तशात अलिकडे लहान-थोर सर्वांना वेळ घालविण्याचे साधन म्हणून (किंवा कधी कामासाठीही) टॅब्लेट लागतातच. लहान मुलांच्या हातात गोष्टींच्या पुस्तकांऐवजी गेम्स खेळण्यासाठी टॅब्लेट्स दिले असतात. मग त्यासोबतही त्याची आयुधं लागणारच. त्यात पुन्हा तुम्ही जिथे जाणार तिथे वायफाय असेलच अशी खात्री नसेल, तर – इंटरनेटसाठी डोंगल सुध्दा हवाच ना!

म्हणजे बाहेरगावी निघतांना सामानात ही सारी उपकरणे आणि त्यांच्या विविध वायर्स यांनीच सुटकेस भरते की! आणि प्रश्न फक्त वायर्सचा नाही. एकवेळ दुसरे काही राहून गेले तरी चालेल, पण यापैकी एकही वायर सोबर घ्यायची राहिली तर ते उपकरणच निकामी. आता यापैकी कोणतेही एक उपकरण / आयुध जरी वापरता येऊ शकले नाही, तर? अकल्पनीयच!

आता आपले आयुष्यच इतके या आयुधांवर अवलंबून असते कि – यांच्याशिवाय करणार काय? आताच्या पिढीला केवळ हा विचारही अस्वस्थ करेल. तर अश्या ह्या आमच्या अत्यावश्यक वायर्स आणि असे हे आपण आजच्या युगाचे वायरमन्स!

Image Source: Clipart.

Friday 10 February 2017

हे खरंच जरूरी आहे का?

हे खरंच जरूरी आहे का?

परवाच इथल्या बंगलोरच्या वर्तमानपत्रात एक बातमी वजा लेख वाचला – ब्रायडल ड्रेस म्हणजेच वधूच्या लग्नातील पोषाखाविषयी. वाचून मनात बरेच विचार उठले –

आता डिमॉनेटायझेसन नंतर पैशाच्या बर्‍्याचश्या व्यवहारांवर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तीन लाखांवरील एकरकमी खरेदीवर अटी / कायदे लागू. आणि त्यामुळे ड्रेस डिझायनर्सच्या व्यवसायावर गदा आली. कारण काय तर सध्याचे ब्रायडल ड्रेसेस हे एकेक सात आठ लाख किंवा त्यावरच असतात.


वधूने एका दिवसासाठी, खरं तर केवळ काही तासांसाठी घालायच्या कपड्यांची किंमत सात आठ लाख? आणि असे हे कपडे नियमितपणे, ऑन रेग्युलर बेसिस, खरेदी केले जातात? ही कल्पनाही अतिशय अश्लिल / बीभित्स व्हल्गर वाटते.

मला अतिशय मागासलेली किंवा पुराण कालातील समजले जाईल. परंतु मी अश्या खर्चाची कल्पनाच करू शकत नाही. आणि हा प्रश्न माझ्या विचारांचा नाही आहे. मुळात हा असा अवास्तव खर्च खरोखरच जरूरी आहे का?

एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलीच्या संपूर्ण लग्नाचा खर्च त्या एका ड्रेसच्या खर्चात होऊन जाईल. तसं पाहायला गेले तर त्या एका ड्रेसच्या पैशात किती तरी गरजेच्या गोष्टी होऊ शकतील – एखाद्या नडलेल्या गरीबाचं जीव वाचवणारं ऑप्रेशन होऊ शकेल, दूर खेडेगावात एखादी लहानशी शाळा सुरू करता येईल ज्यामुळे बरीच मुले शिकून साक्षर होऊ शकतील, उपाशी गोरगरीबांना जर अन्न दिले तर त्या तेवढ्या लाखांमध्ये किती भुकेल्यांची पोटे भरतील सांगा बरं? अनाथालयांना देणगी देता येईल, इस्पितळाच्या बालरुग्ण विभागामध्ये सुधारणा-मदत करता येईल….. पर्याय, गरजा असंख्य आहेत. आपला देश व परस्थिती अशी आहे कि जितकं करावं तितकं थोडंच.

मग अशी परिस्थिती असतांना काही तासांसाठी इतका खर्च करणं हे योग्य आहे का? जी वधु तो पोषाख घालणार तिच्याही मनात एकदाही हा विचार येतच नाही का कि केवळ माझ्या हौसे साठी मी लाखो रूपये खर्च करणार तेच कुणा गरजवंताच्या कामी येऊ शकतात …..आणि कितीही म्हंटले तरी असे भारी कपडे पुन्हा वापरणे कठीणच असते. फार तर फार अगदी घरातल्या लग्नांमध्ये घातले जातील, पण त्यासाठीही सख्खी भावंडे जेमतेम एक किंवा दोन. त्यावेळीही तो लग्नातला ड्रेस घातला जाईलच असे नाही. म्हणजे पडूनच राहणार? तेवढ्यासाठी इतका खर्च?

आपली मानव जात इतकी का स्वार्थी होत चालली आहे, कि स्वतःच्या हौशीमौजीपुढे काहीच सुचत नाही? विचारांचं जराही तारतम्य राहात नाही? खर्च करणार्‍्यांचं यावर एकच उत्तर असतं – लग्न आयुष्यात एकदाच होतं (तसं पाहिलं तर हे ही आता तितकंसं खरं नाही) मग लग्नात नाही तर केव्हा करणार हौस? करावी हौस, पण त्यावरही काही स्व-विचारांनी घातलेल्या मर्यादा नको का? इतक्या पैशांचा चुराडा ….. त्याऐवजी तेच पैसे जर कुणा गरजूंना दिले तर आयुष्यभरासाठी त्यांचे आशीर्वाद नाही का मिळणार?

पण असे हे विचार कुणाला रूचणार? कुणी ऐकायलाही तयार होणार नाही. सर्व जगच धावतयं पैशांच्या पाठी, बरं-वाईट, योग्य-अयोग्य कोण पाहात बसलंय? आजकाल या 'मी'ला फार महत्त्व आले आहे, आपल्याला काय हवे ते करावे, दुसरे गेले उडत. यालाच पूर्वी स्वार्थीपणा म्हणत; आता अ‍ॅटिट्यूड म्हणतात – अन् तो तर अति आवश्यक!



(त्या डिझायनर ड्रेस वाल्यांनी आपल्या व्यवसायासाठी व्यवस्थित पळवाट शोधून काढली – एकाच ड्रेसला तीन वेगवेगळ्या भागात बिभागून तीन वेगळी बिल्स करायची. म्हणजे लेहेंग्याचे तीन लाख, ब्लाउझचे अडीच आणि ओढणीचे अडीच लाख. म्हणजे सर्व बिल्स ही तीन लाखांच्या खालीच आणि पूर्ण पोषाखाचे संपूर्ण पैसेही वसूल. व्वा! याला म्हणतात धंदा!)