अचानक काही अनोखे……
दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरातील प्रेक्षणीय स्थळे कोणासाठीही अपरिचित नाहीत. पण कधी अनपेक्षितपणे काही नवीन समोर आले की एक वेगळाच आनंद मिळतो.
दिल्लीत मी जेथे रहायला होते ती जागा मुख्य शहरापासून जरा दूर, उपनगरासारखी होती. नवीन विमानतळ बांधण्यासाठी हरियाणातील एक पूर्ण गाव घेऊन तेथील गावकर्यांना पुनर्वसनासाठी रंगपुरी / नांगल दैवत येथे जमिनीचे प्लॉट दिले व तेथे या गावकर्यांनी एकाला एक लागून सारख्या दिसणार्या चार मजली लहान अद्ययावत इमारती बांधल्या. शहरात नवीन येणार्या नोकरदारांना भाड्याच्या घरांची सोय झाली. हे सर्व घरमालक, म्हणजे पूर्वीचे शेजारी आपापल्या इमारतींसमोर खुर्च्या, खाटा टाकून बसत आणि एकमेकांना हाकारून गप्पा मारत.
मी तेथे गेले ते नवरात्रीचे दिवस होते. घरासमोरून एक लांब अर्धा कच्चा रस्ता दूरवर जात होता. या सर्व हरियाणवी स्त्रिया रोज सकाळी नैवेद्याचे थाळे घेऊन त्या रस्त्यावरून दूर जातांना दिसत. आम्हीही कुतुहलाने संध्याकाळी फिरत त्या दिशेने गेलो. झाडीने घेरलेल्या मोकळ्या जागेत उबदार बदामी रंगाच्या सँडस्टोन्सची एक सुंदर गढी त्याठिकाणी होती.
ही होती सुलतान गढी.
येथे स्थानिकांची वर्दळ दिसते पण पर्यटकांची गर्दी नाही. अशा या दुर्लक्षित आणि पर्यटकांद्वारे क्वचितच भेट दिल्या जाणार्या वास्तू आपल्या इतिहासातील मैलाचे दगडच आहेत असे म्हणावे लागेल.
आम्ही तिकीट घेऊन उंच दगडी पायर्या चढून वर गेलो. वास्तूचे मोठेमोठे दगड स्वच्छ नि सुंदर दिसत होते. तेथील जे केअर टेकर आहेत, त्यांनी हा प्राचीन इतिहासाचा वारसा खूप छान जतन केला आहे. चारी बाजूंनी उंच खांब, त्यापलिकडे व्हरांडे आणि दगडी भिंतींमध्ये कोरीव महिरपी नि मोठे झरोके आहेत. मध्यभागी संगमरवराचा अष्टकोनी चबूतरा आहे. वास्तूच्या चारी कोपर्यात असलेल्या बुरुजांमुळे ती छोट्याश्या किल्ल्यासारखी दिसते - म्हणूनच नाव सुलतान गढी किंवा राजाची गढी.
हा भारतातील पहिला मकबरा – सुलतान इल्ततमशचा जेष्ठ पुत्र आणि रझिया सुलतानचा मोठा भाऊ नसिरूद्दिन महमंद याचा. नसिरूद्दिन महंमद हा बंगाल (तेव्हाचे लखनौती) गव्हर्नर होता. तो पीर बाबा या नावाने ओळखला जाई आणि एक सूफी म्हणून तो पूज्य होता. त्याचा मृत्यू 1231 मध्ये झाला तेव्हा त्याचे वडिल सुलतान इल्ततमश यांनी दिल्ली येथे त्याचा मकबरा बांधला. नसिरूद्दिन महंमदच्या इतर दोन भावांच्या कबरी व त्यावरील छत्र्याही आसपासच्या परिसरात आहेत.
सर्व बाजूंनी बंद असलेल्या चबूतर्यास एक छोटे द्वार आहे जेथून पायर्या अंधार्या खोलात कबरीपर्यंत उतरतात. या द्वारावर हळदीकुंकवांचे टिळे, शुभचिन्हे व फुले वाहिली होती. आतमध्ये पूर्ण अंधार असतो आणि पायर्या जपून उतराव्या लागतात. खाली तीन कबरी आहेत, परंतु कुठली कबर कोणाची वगैरे काही लिहीलेले नाही. इतर दिवशी अंधार्या कबरींजवळ काहीच हालचाल नसते.
परंतु दर गुरुवारी येथे पीर बाबाचा ऊरूस असावा तशी गर्दी जमते. केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदुही येथे जमतात. दिवे आणि मेणबत्त्या त्या थंड, दमट काळोखाला उजळून टाकतात, आणी त्यांच्या धूराने सर्व वातावरण भारून जाते. सर्व जाती धर्माचे लोक येथे आपल्या प्रार्थना अर्पण करायला जमतात. कोणी धनिक दुपारच्या जेवणाचा लंगरही घालतात.
या सर्वात पुरातन मुस्लिम मकबर्याची पूजा केवळ मुसलमानच नव्हे, तर स्थानिय हिंदूही आपल्या पुराणपुरूषाला पुजावे त्या भक्तीभावाने करतात. याहून अधिक काय हवे?
No comments:
Post a Comment